कोल्हापूर : ‘क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड व नागनाथअण्णा नायकवडी यांनी प्रतिसरकार स्थापन करून जनतेला न्याय दिला. महिलांना सन्मान दिला पाहिजे, सावकारी पाश समूळ नष्ट केले पाहिजेत म्हणून ग्रामसभा, तसेच स्वतंत्र न्यायसंकुल स्थापन केले. कमी खर्चात लग्न करण्यासाठी गांधी विवाह नावाची चळवळ उभी केली होती. एकूणच महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्याचा प्रयत्न प्रतिसरकारच्या माध्यमातून केला गेला. त्यामुळे प्रतिसरकार ही संकल्पना तरुणांनी समजून घेऊन, तिची अंमलबजावणी करण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन वाळवा येथील क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा. मल्लिकार्जुन माळगी यांनी केले.
शिवाजी विद्यापीठ इतिहास अधिविभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड’ व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. मानव्यशास्त्र विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. भारती पाटील अध्यक्षस्थानी होत्या.
प्रा. माळगी म्हणाले, ‘महात्मा गांधी यांनी इंग्रजांना ‘चले जाव’ची घोषणा दिली. त्यानंतर इंग्रज गेले तरी जनतेला त्रास देणाऱ्या स्थानिक राजकारण्यांना धडा शिकवण्यासाठी क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड व नागनाथ अण्णा नायकवडी यांनी प्रतिसरकारची स्थापना केली. हे दोन नेते १९४२च्या चळवळीतील मुखिया होते. त्यांच्या शब्दाखातर त्यांनी तयार केलेल्या तुफान सेनेत हजारो सैनिक सहभागी होऊन देशाशाठी लढले. १९४२मध्ये सेनोली परिसरात इंग्रज अधिकाऱ्यांचे पगार घेवून जाणारी ट्रेन लुटली. यातील सर्व रक्कम शस्त्रे खरेदी करण्यासाठी व इंग्रजांबरोबर लढण्यासाठी वापरली. प्रतिसरकारने जनतेच्या हितासाठी चांगले निर्णय घेतले. कर्ज काढून लग्न करण्यापेक्षा साध्या पद्धतीने लग्न करण्याचा संदेश जी. डी. बापू लाड यांनी कृतीतून दिला; पण सध्या लग्नावर लाखो रुपये खर्च होत आहेत. हा खर्च कमी करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.’
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. भारती पाटील म्हणाल्या, ‘तरुण पिढीला क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांच्या कार्याची ओळख झाली पाहिजे. त्यांच्या विचारांतून राष्ट्राच्या बळकटीसाठी बळ मिळेल. तसेच महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करता येईल.’
इतिहास विभागप्रमुख डॉ. नंदा पारेकर यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. अवनीश पाटील यांनी करून दिला. स्नेहल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. दत्तात्रय मचाले यांनी आभार मानले. या वेळी कुंडल येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अरुण लाड, वसंतराव लाड, व्ही. वाय. पाटील, अशोक पवार, प्राचार्य डॉ. प्रताप लाड, किरण लाड, संपतराव पवार, कंडलिक एडके, डॉ. रत्नाकर पंडित, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, सुरेश शिपूरकर आदी उपस्थित होते.